
शिरोळ : प्रतिनिधी
आलास जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार आय. आय. पटेल तसेच गणेशवाडी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार सौ. राजश्री नंदकुमार माणकापूरे यांना शिरटी गावातून भरघोस मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिरटीचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
शिरटी गावातील जनता ही शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाला नेहमीच प्राधान्य देते. शिरटीमध्ये जातीभेदाचे राजकारण चालत नाही. त्यामुळे काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील उमेदवारांनाच शिरटी गाव बहुमत देऊन विजयाचा गुलाल लावण्यात सिंहाचा वाटा उचलेल, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान, शिरटी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरात आय. आय. पटेल व सौ. राजश्री माणकापूरे यांच्या प्रचाराचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. यानंतर गावामधून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार पदयात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, शिरटी गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निश्चितच मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

याप्रसंगी सरपंच शुभांगी शिरगावे,सतिश चौगुले, प्रकाश माळी, प्रकाश गंगधर, महेश हत्ती, शंकर माळी,चनगोंड पाटील,आलम मुल्लाणी,अभय गुरव, संतोष पाटील, अनिल कांबळे,संजय ढेकळे,पिंटू भोसले, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना,काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


