
शिरोळ : प्रतिनिधी
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार,स्व. दत्ताजीराव कदम, स्व. बाळासाहेब माने, स्व. सा. रे. पाटील, स्व. शामरावअण्णा पाटील या सर्वांनी शिरोळ तालुक्याला एक वैचारिक बैठकी दिली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे सुरु ठेवला आहे. सर्वसामान्यांच्या हातात दगड देणाऱ्यांना मालक म्हणत नाहीत ; तर सर्वसामान्यांच्या हाताला काम देणाऱ्यांना मालक म्हणतात. असा टोला विरोधकांना लगावून राजकीय स्पर्धा नक्की करा पण शिव्या देऊन कधीही करू नका, तुम्ही या अगोदर केलेले काम जनतेसमोर दाखवा आणि विकासावर बोला, आलास जिल्हा परिषद मतदार संघात आज पर्यंत सव्वाशे कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. आलास हे एकमेव मतदार संघ आहे ज्या ठिकाणी दादेपाशा पाटेल यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे. जे लोक जाती – पातीच्या नावाखाली असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत, मात्र या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे ते अशांना थारा देणार नाहीत, त्यामुळे या आलास जिल्हा परिषद मतदार संघात तसेच पंचायत समिती मतदार संघावर राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू विकास आघाडीचे आलास जिल्हा परिषदेचे उमेदवार दादेपाशा पटेल, आलास पंचायत समितीचे उमेदवार फजलअली पटेल, गणेशवाडी पंचायत समितीच्या उमेदवार सारिका केरीपाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गणेशवाडी येथील गणेश मंदिर येथून करण्यात आला याप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते.
याप्रसंगी बोलताना आमदारा यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्याचा विकास साधत असताना आलास परिषद मतदार संघातील सात गावात पुर संरक्षक भिंत व नदीघाट बांधकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील पहिलाच क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आलास येथे राबवण्यात आला आहे. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना या प्रोजेक्टचा लाभ होणार आहे.
विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, गेल्या दहा वर्षाचा तुम्ही केलेलं काम सांगा, मी माझं काम सांगतो आणि जनता जे कौल देईल ते आपण मान्य करू, असा टोला लगावून ते म्हणाले, राज्य शासन जलसंपदा विभागाच्या मार्फत नदीतील पाणी शेतापर्यंत पोहोचवण्याचे काम केले मात्र आम्ही पुढाकार घेऊन शेतातील पाणी नदीपर्यंत पोहोचवण्याचा क्षारपडमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवला आहे. याचा फायदा थेट राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आलास येथे हा पायलट प्रोजेक्ट राबवून ३० हजारामध्ये शेतकऱ्यांना आपली शेती क्षारपडमुक्त करीत आहेत. त्यामुळे शेतावर कर्ज काढून क्षारपड मुक्तीच्या योजना राबवण्यापेक्षा शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही केले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने शिरोळ तालुका हा मेडिकल हब बनवण्याचे काम आम्ही केले आहे. तालुक्यातील एकही नागरिक आरोग्य समस्येसाठी तालुक्याच्या बाहेर जाणार नाही, या दृष्टीने शिरोळ तालुक्यात ९५० बेड उपलब्ध करून देत आहोत. या मतदारसंघाच्या विकासासाठी यापुढे देखील निधी कमी पडू देणार नाही, येणाऱ्या कन्यागत काळात या परिसरातील विकास पूर्ण करण्यासाठी आपला माणूस या मतदार संघाचा नेतृत्व करणारा असायला पाहिजे त्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. या प्रसंगी सतीश मलमे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्वागत सरपंच प्रशांत अपिणे यांनी केले.
या प्रसंगी सईद पटेल, सुकुमार किनिंगे, सरपंच शफी पटेल, जयपाल कुंभोजे, धनपाल खोत, आनंदा कुम्मे, मुनीर शेख,अमोल हिंगणगावे, आदिनाथ आरबाळे, राजेंद्र कुचनुरे,आलास सरपंच सचिन दानोळे, सुभाष शिरगावे, विद्यासागर मरजे, गोविंद कोल्हापुरे यांच्यासह आलास जिल्हा परिषद मतदार संघातील राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


