
शिरोळ : प्रतिनिधी
आलास जिल्हा परिषद मतदारसंघात बहुजन समाजाच्या एकजुटीचे चित्र सध्या पाहायला मिळत असून,येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहुजन समाजाला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास औरवाड बहुजन समाजाचे प्रमुख राजाराम रावण यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत शहापुरे आणि पंचायत समिती उमेदवार गुरुदास खोचरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.औरवाड येथे आयोजित बहुजन समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध गावांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बहुजन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजाराम रावण म्हणाले की, आलास मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण,ऊर्जावान आणि काम करण्याची स्पष्ट दृष्टी असलेले प्रतिनिधी सत्तेत जाणे आवश्यक आहे.प्रशांत शहापुरे आणि गुरुदास खोचरे हे दोन्ही उमेदवार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारे असून, विकासाला गती देण्याची त्यांची क्षमता आहे.ते पुढे म्हणाले,बहुजन समाजाने जर एकत्र येऊन निर्णय घेतला, तर परिवर्तन अटळ आहे. आलास मतदारसंघात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याची गरज आहे. हे काम प्रशांत शहापुरे आणि गुरुदास खोचरे नक्कीच करू शकतात. त्यामुळे प्रशांत शहापुरे म्हणजे मीच उमेदवार आहे,अशा भावनेने प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे.
राजाराम रावण यांनी बहुजन समाजाच्या संघटनेची ताकद अधोरेखित करत सांगितले की, समाज एकदिलाने उभा राहिल्यास कोणतीही राजकीय लढाई कठीण नाही.या निवडणुकीत केवळ विजय नव्हे,तर आलास मतदारसंघाच्या विकासाचा पाया घालण्याची ही संधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत, बहुजन समाजाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासासाठी मतदान करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.
प्रशांत शहापुरे आणि गुरुदास खोचरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत,त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. बैठकीच्या शेवटी बहुजन समाज एकजूट,विकासाची देऊ नवी वाट अशा घोषणा देत वातावरण उत्साहपूर्ण झाले. आलास मतदारसंघात बहुजन समाजाची ही वाढती एकजूट आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


