मलकापूर प्रतिनिधी :
मलकापूर नगरपरिषद हद्दीतील भाजी मार्केट संदर्भातील वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला असून मारुती मंदिर ते नरहर मंदिर दरम्यान एकदिवस आड समोरासमोर भाजी मार्केट सुरू करण्याची मागणी नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.सध्या उपलब्ध जागेअभावी भाजी उत्पादक शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपला माल विक्रीस ठेवताना तसेच नागरिकांना भाजी खरेदी करताना गैरसोय होत असून त्यामुळे वाहतूक कोंडी व गर्दीची समस्या निर्माण होत आहे.
मारुती मंदिर ते नरहर मंदिर परिसरातील रस्ता भाजी मार्केटसाठी योग्य असल्याने येथे एकदिवस आड समोरासमोर भाजी बाजार सुरू केल्यास शेतकऱ्यांना न्याय्य विक्रीची संधी मिळेल. तसेच भाजी विक्रेत्यांसमोर साईडला ‘सिम-विषम’ पद्धतीने वाहन व मोटारसायकल पार्किंगची व्यवस्था केल्यास नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर पद्धतीने भाजी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.या व्यवस्थेमुळे वाहतूक नियोजन सुलभ होऊन सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

तसेच मलकापूरमधील व्यवसाय वाढीस चालना मिळून पंचक्रोशीतील नागरिकांना शहराकडे आकर्षित करता येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मारुती मंदिर ते नरहर मंदिर दरम्यान एकदिवस आड भाजी मार्केट सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. नागरिकांना आता नगरपरिषदेच्या सकारात्मक निर्णयाची प्रतीक्षा आहे.


