पन्हाळा तालुक्यातील आपटी पैकी सोमवारपेठ गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वन अधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामपंचायत आपटीचे सरपंच यांना निवेदन दिले आहे.
गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना शेतातील दैनंदिन कामे, वैरण कापणी व शेतीची कामे करणे धोकादायक ठरत आहे. विशेषतः अंगणवाडी व शाळा परिसरात बिबट्याचा वावर अधिक असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता तानाजी शामराव केसरकर हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले असता बिबट्याने गुरगुरत त्यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला व ते सुखरूप घरी परतले. या घटनेनंतर ग्रामस्थांमधील भीती आणखी वाढली आहे.
सध्या शेतातील गवत कापणी सुरू असल्याने शेतकरी व महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत व गावकऱ्यांना सुरक्षितता द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी आशिष पाटील, अमर जाधव, सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कदम, प्रताप जाधव, बाळासो बच्चे, सुरेश गायकवाड, संजय जाधव, दगडू काशीद, गुंगा केसरकर, तानाजी खांबे यांच्यासह गावातील महिला व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पन्हाळा प्रतिनिधी/ सचिन वरेकर



