मलकापूर प्रतिनिधी —
मलकापूर शहरातील गुरुवार पेठ तसेच मलकापूर हायस्कूल प्राथमिक शाळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून एका पांढऱ्या रंगाच्या भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कुत्र्याने आतापर्यंत सुमारे १५ ते २० नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
या परिसरात पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीपर्यंतचे शाळेचे वर्ग भरतात. त्यामुळे रोज शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून पालकांमध्येही चिंता वाढली आहे. एखाद्या शाळकरी मुलाला या कुत्र्याने चावा घेतल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सदर कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी मलकापूर शहरातील नागरिकांकडून होत आहे.

मलकापूर नगर परिषद तसेच आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी एकमुखी मागणी सध्या मलकापूरमध्ये होत आहे.



