कुंभोज (ता. हातकणंगले) कुंभोज–हातकणंगले रोडवरील झालेल्या भीषण अपघातात सानिका संजय सपकाळ व आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. चौकशीला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून कुंभोज ग्रामस्थांनी आज शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र मोर्चादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि घोषणांमुळे हा मूक मोर्चा पुढे जनआक्रोश बनण्याची चिन्हे दिसत आहेत.चार दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी–चारचाकी अपघातात गावातील कन्या सानिका सपकाळचा मृत्यू झाल्याने कुंभोज शोकमग्न आहे. अपघातातील आरोपींवर कारवाई न करता चौकशीला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. राजकीय दबावामुळे पोलीस टाळाटाळ करत असल्याचेही अनेकांनी स्पष्ट केले. मूक मोर्चा हा पूर्ण गावातून काढण्यात आला यावेळी नाभिक व इतर समाजाचे कार्यकर्ते, गावातील युवक मंडळे, महिला माता–भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सानिका सपकाळ व आनंदराव जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन मिनिटे शांतता पाळत श्रद्धांजली वाहिली.ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की,“दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर हा मूक मोर्चा आक्रोश मोर्चात रूपांतरित होईल, आणि त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.”कुंभोजातील वाढता तणाव व नागरिकांचा निर्धार पाहता पुढील काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे




