
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळच्या दत्त कारखान्याने जाहीर केलेला ३४०० रुपये दर मान्य नाही व परवडणारा दर देत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेने केलेले आहे. अंकुशच्या या आव्हानाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला दिसत आहे. तुरळक ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तोडी घेतलेल्या आहेत, त्यांना समजावून सांगून, ऊस तोडी बंद करण्याची विनंती अंकुश संघटनेकडून करण्यात येत आहे.
अर्जुनवाडमध्ये चालू असलेल्या तोडी अंकुश संघटनेकडून बंद पाडण्यात आल्या आहेत. अर्जुनवाड मधील शेतकर्यांनीदेखील आंदोलन अंकुशच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. तोडी बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना समजावून सांगत असताना, दत्त कारखान्याचे अर्जुनवाडमधील दोन संचालक व आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.
शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या आड येणाऱ्या या संचालकांच्या विरोधात आज संध्याकाळी अर्जुनवाड मध्ये आंदोलन अंकुश संघटना जाहीर सभा घेणार असल्याचे यावेळी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी संगितले.


