
शिरोळ : प्रतिनिधी
जनतेसमोर प्रशासनातील अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी मोठे नसतात, तर जनताच मोठी असते याची जाणीव प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे. गेली सात दिवस शिरोळकरांना पाणी मिळावे यासाठी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनाने आणि खासदार व आमदारांनी दखल घेतली नाही. यामुळे शिरोळकरांच्या मनात त्यांच्या विरोधात संतप्त भावना आहेत. यामुळे येणाऱ्या काळात टाळे ठोक, गाव बंद, रास्ता रोको आशा मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. असा इशारा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आंदोलनस्थळी बोलताना दिला. शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे याकरिता गेल्या सात दिवसापासून शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

आंदोलन स्थळी बोलताना दरगू गावडे म्हणाले की जनतेच्या मागण्यासाठी उग्र आंदोलनच करावे लागते. त्याशिवाय प्रशासनाचे डोळे उघडत नाही. गेल्या सात दिवसापासून आंदोलन सुरू असताना प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि खासदार व आमदार यांनी या ठिकाणी भेट दिली नाही हे जनतेचे दुर्दैवच मानावे लागेल. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी प्रचंड घोटाळा करून ते पळून गेले आहेत. त्यांनी शिरोळकरांचा प्रश्न सोडवावा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. येणाऱ्या काळात रास्ता रोको, गाव बंद, टाळे ठोक, अशी वेगवेगळी आंदोलने करून शासनाला जाग आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी शेवटी सांगितले.
युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनीही जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी व शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी प्रशासनाला नमते घ्यावेच लागेल लोकलढ्यासमोर कोणीही मोठा नसतो. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाची तीव्रता निश्चित वाढवली जाईल असे सांगितले.
माजी आमदार उल्हास पाटील यांनी आंदोलने स्थळी भेट देऊन आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे,इम्रान आत्तार, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर, विजय आरगे, भगवान आवळे, रावसाहेब माने, अविनाश उर्फ पांडुरंग माने, आनंदराव माने देशमुख, दिगंबर सकट, बाळासाहेब कोळी, बापूसाहेब गंगधर, कृष्णा भाट , एम. एस. माने, भालचंद्र ठोंबरे, दिलीप संकपाळ, सिताराम शिंदे, दिलीप माने, अनिल लोंढे किरण जगताप, संजय बंडगर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला नागरिकांचाही उत्स्फूर्तपणे पाठबळ मिळत आहे.