
शिरोळ : शिरोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा वानवा झाला आहे. शहरवासीयांच्या मिळकतीवर आकारल्या जाणाऱ्या करावर लावले जाणारे व्याज आणि दंड या दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत.शहर विकास आराखड्याच्या दृष्टीने कोणत्या जमीनी आरक्षित केल्या जाणार ? याबाबत नागरीकामध्ये संभ्रमावस्था आहे. त्यासाठी एकसंघ होऊन दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
शहरात पाणीपुरवठ्याची यंत्रणा विस्कळीत होऊन नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याबाबतीतही नगरपरिषदेकडून कोणतीही ठोस उपाय योजना केली नाही या सर्व बाबतीत हम करो सो कायदा अशी भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.
अशा सर्व अन्यायकारक धोरणा बाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अन्यायकारक बाबीवर वेळेत, निर्णय न घेतल्यास काळ सोकावणार आहे. त्यामुळे, बुधवार दि. ६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे शहरातील नागरिक, मिळकत धारक यांची विचार विनिमय आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला सर्व नागरिक व मिळकत धारकांनी उपस्थित राहून आपली मते व्यक्त करावीत. एकजुट बळकट करावी, असे आवाहन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.


