
कोल्हापूर: निर्भय बनो आंदोलन चालवणारे विश्वंभर चौधरी यांची सिन्नर येथे शांतपणे चाललेली सभा धर्मांध गुंडांनी बळजबरीने बंद करावयास लावली. सभा उधळली. या धर्मांध गुंडांचा तीव्र निषेध शिवाजी पेठे मधील पुरोगामी कार्यकर्त्यांनी केला.
सुरुवातीला कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले “विश्वंभर चौधरी आपल्या व्याख्यानातून निर्भय बनो, असा संदेश देतात. आज देशात इ डी, सीबीआय पोलीस यंत्रणा, यांच्या दहशतीखाली कार्यकर्ते आणि सर्वसामान्य समाज आहे. लोकांनी निवडून दिलेले आमदार खोके देऊन किंवा ईडीच्या दहशतीखाली पळवून नेले जातात. हे सत्य सांगितले तर गुंडगिरी करून व्याख्यान बंद पाडले जाते म्हणून आम्ही अशा गुंडगिरीचा निषेध करत आहोत”.
कॉम्रेड चंद्रकांत यादव म्हणाले, “दोन कोटी रोजगार देण्याचा, काळे धन देशात आणण्याचा, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याचा, पंतप्रधानांनी केलेला वायदा खोटा ठरला आहे. पण, पंतप्रधानाना उलट प्रश्न विचारता येत नाही. प्रश्न विचारणाऱ्यावर कारवाई होते. त्याला देशद्रोही ठरवले जाते. पण आपण निर्भयपणे सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत.”
आनंदराव चौगुले म्हणाले ,”आपण सहिष्णू हिंदू असून, आमचा राम हा कुटुंब वत्सल राम आहे, धनुष्य ताणलेला श्रीराम नव्हे. आम्ही राम राम म्हणतो. आम्ही राम नवमीला पाळणा हलवून सुंठवडा खातो. डॉल्बी वाजवत नाही. अशी टीका केल्यामुळे धर्मांध गुंडानी, सभा बंद पाडली” त्यानंतर धर्मांध गुंडांचा निषेध शिवाजी पेठे मध्ये निदर्शने करून करण्यात आला. “देशातील धर्मांध शक्तीला घाबरून आम्ही काम बंद करणार नाही” असा इशारा जयवंत मिठारी यांनी दिला. पंडित कंदले यांनी सर्वसामान्य जनता 2024 साली याचा जाब विचारेल असे भाकित केले.
यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, कॉम्रेड अनिल चव्हाण, जयवंत मिठारी, शोभा पाटील, राजेंद्र खद्रे, पंडित कंदले, संभाजी इंगवले, शिवाजी गिरी गोसावी, संजय चौगुले, आनंदराव चौगुले, अस्मिता इंगळे, रंजना जाधव सरिता हरूगले, छाया जाधव, विष्णू बंडोपंत गाडीवान, राजश्री गोळे, भारती आडूरकर, रवी चव्हाण, पी एन कांबळे जीवन बोडके, अनिल अपराध आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


