राज्यात अलीकडे घडलेल्या
विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमधील मुलींच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कालकथित सुरेश कडाळे फाउंडेशन, कोल्हापूरचे विश्वस्त आयु. सुचितोष कडाळे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रवेशद्वार, कॉरिडॉर आणि मैदान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आतून कडी-कुलूप असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध करून देऊन त्यांची नियमित स्वच्छता करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शाळांच्या परिसरात ‘गुड टच बॅड टच’ विषयक जनजागृती फलक, सायबर सुरक्षेची माहिती, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक १०९८ व १०९१ तसेच तक्रार पेटी अनिवार्यपणे ठेवावी, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे.
शाळा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या देखरेखीखाली तालुका स्तरावर दरमहा नियमित आढावा बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदनाच्या शेवटी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा विषय हा त्यांच्या भवितव्याशी आणि आरोग्याशी निगडित असल्याने शिक्षण विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व शाळांना कडक निर्देश जारी करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनाही देण्यात आली आहे.
केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे



