
शिरोळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र पंचायत राज्य समृद्ध अभियानांतर्गत आणि दीपावली सणानिमित्त शिरटी (ता शिरोळ) ग्रामपंचायतीच्यावतीने गावात स्वच्छता मोहीम राबविल्याने परिसर स्वच्छ आणि चकचकीत झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.
आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुस्थितीत असावे. गावात साथीचे रोग फैलावू नयेत. घाणीचे साम्राज्य पसरू नये. याकरिता शिरटी ग्रामपंचायतीकडून नियमित स्वच्छतेसाठी वेळोवेळी कारवाई केली जाते. वर्षातून किमान चार वेळा स्वच्छता अभियान राबविले जाते. दीपावली सणाचे औचित्य आणि समृद्ध पंचायत राज्य अभियानांतर्गत गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत गावातील सर्व रस्त्यांची स्वच्छता केली. रस्त्यावर आलेले उकिरडे काढण्यात आले. गावची स्मशानभूमी परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. नदी पाणवठा स्वच्छ करण्यात आला. शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच गावातील सर्व कचऱ्याचे संकलन करून ज्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मालकीचे मोठ-मोठे खड्डे आहेत ते खड्डे मुजविण्यासाठी खड्ड्यात तो कचरा टाकला जातो. ग्रामपंचायतीने राबविलेल्या स्वच्छता उपक्रमामुळे शिरटी परिसर चकचकीत दिसत आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य राहुल सूर्यवंशी, सौ. अनिता चौगुले, सौ. हसीना मुल्लाणी, माजी उपसरपंच सागर पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. भारती माळी, ग्रामविकास अधिकारी एम. आर. पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.


