
शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणामध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला असून नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार करण्यात आला आहे. नवीन आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या जाणार असून विद्यार्थ्यांवर असणारा ताण कमी करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार केला आहे. आता २०२४ या शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपुस्तक विकसित केली जाणार असून, बोर्ड परीक्षा या दोन टप्प्यात होणार आहेत.
तसेच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. यातील एक भारतीय भाषा असणार आहे. हा निर्णय देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी घेतला आहे असे नॅशनल करिक्युलियम फ्रेमवर्कमध्ये सांगितले आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोन टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला वर्षातून दोन्ही वेळा बोर्डाची परीक्षा देण्याची मुभा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर मिळणाऱ्या गुणांपैकी सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.


