उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “काही निवडणुका जानेवारी महिन्यात होऊ शकतात, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल,” असं ते म्हणाले. पुणे दौऱ्यावर असताना ग्रामीण भागातील विकासकामांची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले की, “गावं डिजिटल झाली पाहिजेत. निवडणुकांसाठी तयारीला लागा. जानेवारीत नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे. निवडणुका आधीच व्हायला हव्या होत्या पण कोर्टीनं प्रकरण प्रलंबित ठेवल्यामुळे उशीर झाला.”
ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक गाव स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झालं पाहिजे. गांधीजींनी सांगितलेला विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. गाव सक्षम झालं तर देश सक्षम होतो. ग्रामपंचायत ही केवळ सरकारी यंत्रणा नसून लोकशाहीची शाळा आहे.”
अजित पवार यांनी यावेळी ग्रामीण भागातील विकास, ग्रामसभा, महिला सक्षमीकरण, कुटीर उद्योग यावर भर दिला. तसेच २५ कोटी झाडे लावण्याचा मानस व्यक्त केला.
मराठा आरक्षणावर बोलताना पवार म्हणाले की, “पूर्वी काही जण आंदोलनातून राजकीय फायदा घेत होते, पण आता गप्प बसले आहेत.”



