Home Uncategorized माधुरी’च्या विरहाने कोल्हापूर पेटलं; नांदणी गावाचा जिओवर बहिष्कार, हजारोंचा लोकशाहीतून लढा सुरू

माधुरी’च्या विरहाने कोल्हापूर पेटलं; नांदणी गावाचा जिओवर बहिष्कार, हजारोंचा लोकशाहीतून लढा सुरू

5 second read
0
0
252

कोल्हापूर, प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात सध्या संतापाचं वातावरण आहे. गेली ३३ वर्षं गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक आयुष्याचा अविभाज्य भाग ठरलेली ‘माधुरी’ उर्फ महादेवी हत्तीण आता गावात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात रवाना करण्यात आलं आणि गावकऱ्यांना जणू आपल्या काळजाचा तुकडाच हरवलेला वाटू लागला.

महादेवीचा भावनिक इतिहास
गेल्या चार दशकांपासून नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात वास्तव्य करणारी महादेवी ही पंचकल्याण पूजा, मिरवणुका आणि धार्मिक सोहळ्यांचे मुख्य आकर्षण ठरली होती. तिच्या संयमी स्वभावामुळे ती गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या मनात घर करून होती.

वनतारा विरुद्ध नांदणी
अलीकडे अंबानींच्या वनतारा ट्रस्टने महादेवीवर दावा करत तिला त्यांच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केली. परिणामी सुरू झालेली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर येऊन संपली आणि २८ जुलै रोजी तिच्या गुजरात प्रस्थानाचे आदेश कायम ठेवण्यात आले.

जिओवर बहिष्कार – भावनांचा उद्रेक
महादेवीच्या विरहाने व्यथित गावकऱ्यांनी रिलायन्स जिओ नेटवर्कवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तब्बल ७ हजार नागरिकांनी आपली जिओ सिम बंद करत इतर कंपन्यांकडे पोर्टिंग केलं. हा निषेध केवळ नांदणीपुरता मर्यादित न राहता, मठाशी संबंधित ७४३ गावांमध्येही पसरला आहे.

सोशल मीडियावर हक्काची चळवळ
#SaveMahadevi, #BoycottJio, #JioBan हे हॅशटॅग ट्रेंड करत असून, नागरिक आपल्या सिमचे स्क्रीनशॉट शेअर करत भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. काही जण तर रिचार्ज बाकी असतानाही जिओ वापरणं बंद करत आहेत.

ग्रामसभांचे ठराव, लोकप्रतिनिधींची साथ
हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने ठराव करून महादेवीला परत आणण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम सुरू केली असून, खासदार धैर्यशील माने हेही संसदेत या मुद्द्याचा आवाज उठवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

न्यायासाठी शांत आणि कायदेशीर लढा
गावकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला असला, तरी त्यांच्या भावना सुस्पष्ट आहेत — हा लढा शांततेने, कायदेशीर मार्गाने सुरू राहील. नांदणी गाव आणि त्याच्या पंचक्रोशीतील गावकरी आज एकजुटीने सांगत आहेत:
“ही लढाई हत्तीणीसाठी नाही, आपल्या संस्कृतीसाठी आहे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…