
जयसिंगपूर येथील राधाबाई रोडवरील
पाचव्या गल्लीतील बंगल्यातून भरदिवसा चाळीस लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात ४३ तोळ्यांच्या दागिन्यांसह हिऱ्यांच्या डायमंड ब्रेसलेटचा समावेश आहे. याबाबतची तक्रार श्रीभगवान राजाराम बियाणी (वय ७६) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. ही घटना २२ मे रोजी सकाळी दहा ते दुपारी तीनच्या सुमारास घडली असून हा प्रकार रविवारी उघडकीस आला. संशयित म्हणून महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे
याबाबत माहिती अशी, बियाणी यांचा पाचव्या गल्लीत बंगला आहे. गुरुवारी (दि. २२) बियाणी कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. याचवेळी अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून पहिल्या मजल्यावरील लाकडी कपाट उचकटून त्यात ठेवलेले डायमंडचे ब्रेसलेट, सात तोळ्यांचा नवरत्न हार, आठ तोळ्याचा राणीहार, १५ तोळ्याचा कमरपट्टा, साडेआठ तोळ्याचे झुमके, साडेआठ तोळ्यांची बोर. बिंदी असा ४० लाखांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, रविवारी जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पाहिले व तसेच ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचरण करण्यात केले होते.


