
जयसिंगपूर : प्रतिनिधी
रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपट दराने मोबदला शेतकऱ्यांना अदा केला आहे, परंतु अंकली ते चोकाक या ३३ किमी अंतरातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळत देणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एकाच महामार्गावरती अधिग्रहण केलेल्या जमिनींना वेगवेगळे दोन दर दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून विविध गावांमध्ये आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान भवनात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत सकारात्मक चर्चा केली व लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यात मोठी तफावत आहे. इतर ठिकाणी चौपट दर देण्यात आला असताना, शिरोळ तालुक्यात मात्र दुप्पट दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ठामपणे मागणी केली की, इतर भागातील शेतकऱ्यांना चौपट दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना कमी दर देणे हा अन्याय आहे. त्यामुळे अंकली ते चोकाक भागातील शेतकऱ्यांनाही चौपट दर द्यावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार यड्रावकर यांच्या मागणीची दखल घेतली असून, लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


