प्रतिनिधी : नामदेव निर्मळे
जून महिन्यामध्ये पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज #BrandKolhapur अंतर्गत त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर ही क्रीडानगरी आहे. कमालीची जिद्द, जिंकण्याची प्रचंड इच्छाशक्ती हे आपल्या कोल्हापूरच्या मातीतील खेळाडूंचे अंगभूत कौशल्य आहेच. कुस्ती, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, नेमबाजी, स्विमिंग, बुद्धिबळ, कबड्डी, टेनिस, मॅरेथॉन सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रीडाधोरणातून उदयास आलेली आपली ही क्रीडापरंपरा आजची युवा पिढी देखील यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. खाशाबा जाधव, स्व. पै. गणपतराव आंदळकर, स्व. पै. दादू चौगले, अशा ज्येष्ठांपासून तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, वीरधवल खाडे, अनुजा पाटील, अनिकेत जाधव, निखिल कदम, रेश्मा माने, कस्तुरी सावेकर, विम्बल्डनमध्ये खेळणारी ऐश्वर्या जाधव, नुकताच महाराष्ट्र केसरी पटकावलेला पृथ्वीराज पाटील अशा युवा पिढीपर्यंत सर्वांनीच कोल्हापूरचे नाव मोठे करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे.

हे यशोशिलेदार जेव्हा एखादी गोष्ट अचिव्ह करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात आपल्या गावाच नाव मोठं करत असतात. शेवटी एखाद्या गावाची आयडेंटिटी बनते ते कशामुळे? तर तिथल्या माणसांमुळेच!! त्यामुळे, या सर्वांचा आपल्या गावाच्या नावाने सन्मान केला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून २०१८ साली #BrandKolhapur हा उपक्रम सुरू झाला.
यंदाच्या खेलो इंडिया सारख्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोल्हापूराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे मनापासून अभिनंदन. तसेच हे सर्वजण आपल्या खेळामध्ये अशीच उत्कृष्ट कामगिरी करत आपले, आपल्या गावाचे, कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठे करण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा! अश्या शुभेछया आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिल्या


