
तलाठ्याचे काम असमाधानकारक असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील पोलिस ठाण्यालगत असलेले तलाठी कार्यालय फोडले. त्यामुळे कार्यालयात काचांचा खच पडला होता. या घटनेमुळे जयसिंगपूरसह परिसरात खळबळ उडाली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत झाली नव्हती. जयसिंगपूर येथील तलाठी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथील तत्कालीन तलाठी लाच घेताना सापडले होते. त्यानंतर महिन्यापूर्वी या ठिकाणी प्रसाद काळे हे नवीन तलाठी आले आहेत. अधिक माहिती घेण्यासाठी तलाठी प्रसाद काळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, मी दुचाकीवर आहे नंतर माहिती देतो, असे सांगून फोन बंद केला. दरम्यान, कार्यालय फोडल्याने या घटनेची जयसिंगपूर परिसरात मोठी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. घटनेनंतर मंडल अधिकारी व कोतवाल यांनी कार्यालय बंद ठेवले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील तलाठी कामकाजात लक्ष देत नाहीत, कार्यालयात आलेल्या नागरिकांना नाहक त्रास देऊन नागरिकांना त्रस्त करीत आहेत. तलाठी यांच्याबद्दल नागरिक तक्रारी करीत असून, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी वाद घालत आहेत. त्यामुळे जयसिंगपूर येथील तलाठ्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले आहे.


