मलकापूर प्रतिनिधी:
मलकापूर येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या काळात पुराच्या पाण्यात जाऊन आपले कर्तव्य बजावत असलेल्या राम घेवदे यांच्यासह अन्य वायरमन यांचा श्री ब्राह्मण सेवा संघ मलकापूर यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. राम मंदिर भटगल्ली मलकापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास संघाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व युवक उपस्थित होते.

मलकापूर शहरात कडवी आणि शाळी नदीचे पाणी पात्रा बाहेर पडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत शहरातील विद्युत पुरवठा खंडित होत होता, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करत श्री ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भटगल्ली येथील राम मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री ब्राह्मण सेवा संघाचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचबरोबर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मलकापूर परिसरातील वायरमन व लाईनमन राम घेवदे, रमेश पाटील, सुधीर कुंभार, सागर खोत, राहुल गर्जे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव कुलकर्णी यांनी. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले मात्र तुम्ही सर्वांनी दिलेले पाठबळ आणि आमचा उंचावलेला आत्मविश्वास यामुळेच आम्हाला अधिक प्रेरणा मिळत असते. अनेक प्रसंगात सर्वसामान्य जनतेने दिलेले पाठबळ हेच कर्मचाऱ्यांसाठी खूप मोलाचे ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


