
कोल्हापूर : संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) येथील पाणीपुरवठा येत्या आठ दिवसात सुरळीत करा, पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व उपाययोजना चा अभ्यास करून त्या मार्गी लावा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार जयश्री जाधव यांनी बापट कॅम्प येथील पाणी प्रश्न संदर्भात नागरिक, लोकप्रतिनिधी व पाणीपठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.बापट कम्प परिसरात महिन्याभरापासून कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होता. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीच बंद झाले. त्यामुळे घरात वापरण्यासाठी तसेच पिण्यासाठी पाणी नाही.

खासगी टँकर मागवणे परवडणारे नाही, दररोज पाणी आणायचे कोठून? असे प्रश्न महिलांनी उपस्थित केले. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन दिली, आंदोलने केली. तरीही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठाचे अधिकारी केवळ आश्वासने देण्याचे काम करतात अशी तक्रार नागरिकांनी केली.
यावर आमदार जाधव यांनी संतप्त होऊन, अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. पाण्यासाठी महिला वणवण फिरत असताना, अधिकारी ऑफिसमध्ये बसून फाईल फिरवत आहेत का ? नागरिकांना पाणी देणे हे पुण्याचं काम आहे. त्यांच्याकडून बिल वसूल करता, मग पाणी देणे तुमचे कर्तव्य आहे. पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ज्या उपाय योजना कराव्या लागतात, त्याचा आराखडा तयार करा. त्यासाठी लागेल तो निधी देतो. तसेच काहीही करा, माणसे वाढवा, यंत्र वापरा परंतु येत्या आठ दिवसात त्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.
येत्या आठ दिवसात बापट काम परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कनिष्ठ अभियंता अरुण गुजर, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी दिले.
यावेळी माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी नगरसेवक प्रकाश सरवडेकर, सतीश कुंभार बाचणकर, विनायक कुंभार, भाग्यश्री पाटील, शैलेश बाचणकर, किरण माजगावकर, पुष्पा बिडकर, सुनिता कुंभार आदी उपस्थित होते.


