
शिरोळ नगरपरिषदेकडून काही दिवसापूर्वी विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर शहर व शहरालगतच्या ठराविक जमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याची जाहीर प्रसिद्धी केली आहे. या आरक्षण प्रसिद्धीमध्ये शहरातील अनेक, गोरगरिब, अल्पभूधारकांच्या जमिनी जागा गुंतवण्यात आल्या आहेत. जमीन, आरक्षणामुळे नागरिक, शेतकऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
जमीन आरक्षणाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. आरक्षणाचा लढा कसा व कोणत्या पद्धतीने द्यायचा? यासाठी रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी शिरोळ येथील कल्लेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडले आहे, अशा शेतकऱ्यांच्या विचाराने, विनिमयाने पुढील मार्ग अवलंबला जाणार आहे. तरी, जमीन आरक्षणात पीडित झालेल्या सर्व शेतकरी, नागरिक, बांधवांनी उपस्थित रहावे,असे आवाहन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे.


