आंबा:
श्री आदिष्ठी माता हे प्रभावी शक्ती पीठ आहे. तिच्या छत्रछायेखाली ऐक्य जपावे. नामस्मरण आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येकाने सजग रहावे. व्यसन,मत्सर, मतभेद यांना थारा न देता सामाजिक अधिष्ठान बळकट करावे असे आव्हान शंकराचार्य विद्या नरसिंह स्वामी यांनी केले .मानोली येथील ग्रामदैवत श्री आदिष्ठी देवीच्या नूतन मुर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते प्रवचन देत होते . यावेळी श्री स्वामी यांच्या हस्ते स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा ब्रह्मादिमंडळ देवता स्थापना, प्रधान देवता मुर्तींची प्राणप्रतिष्ठा षोडशोपचार महापूजा, होम हवन, बलिदान, पूर्णाहुती नैवेद्य, महाआरती, आशीर्वाद व प्रसाद वाटप झाले. ग्रामदैवत श्री आदिष्ठी देवीचा नुतन मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गेले पाच दिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाला. या पाच दिवसांत देवतांची नगर प्रदक्षिणा पार पडली.यावेळी शिवकुमार शास्त्री गुरूजी यांनी प्रायश्चित्त होम,कुष्मांड होम केला.सोमवारी देवतांना तांबूलादि प्रदान, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध कर्म पार पडले.यावेळी संत कृपा भजनी मंडळाचा (निनाई परळे) दिंडी सोहळा व स्वर माऊली कोल्हापूर प्रस्तुत भक्तीरंग कार्यक्रम झाला.

यावेळी ह. भ. प. उमेश महाराज ( सातारकर ) यांचे कीर्तन तर शंभूमहादेव भजनी मंडळाचा सुस्वर भजन कार्यक्रम व शास्त्रीय संगीत कार्यक्रम झाला. यावेळी ह. भ. प. उत्तम पांडुरंग गुरव महाराज रा. महादेववाडी, ता. वाळवा, जिल्हा. सांगली यांचे कीर्तन होईल त्यानंतर जय भारत सोंगी भजनी मंडळ. रांगोळी यांचा भजनी कार्यक्रम होईल. हळदी कुंकू वाटप व महाप्रसादाचे सोहळ्याची सांगता झाली.मंदिराची मानकरी राजाराम पाटील, दीपक पाटील, संदीप पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गोमाडे,महिपती बागम, आत्माराम बागम, नंदकुमार बागम, राजू पाटील सरपंच रामचंद्र पाटील, दत्तात्रय गोमाडे यांचे सोहळ्यास योगदान लाभले.या सोहळ्यास माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सत्यजित पाटील उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन आदीष्टी देवी मंदिर समिती व तरूण विकास मंडळ मुंबई व ग्रुप ग्रामपंचायत केले.


