
अवनि संस्था संचलित महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या बालविवाह रोखण्यासाठी जागर प्रकल्प अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक जनजागृती समाजामध्ये केली जाते. तसेच मुलांसाठीच्या ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन व सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी एका मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावातील अल्पवयीन मुलीचा साखरपुडा झाला असून तिचा बालविवाह होणार असल्याची माहिती अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाला मिळाली. त्यानुसार अवनि संस्था संचलित जागर प्रकल्पाने त्या ठिकाणी भेट देऊन ग्रामसेवक, सरपंच यांना या केस बाबत लेखी माहिती देऊन सदर मुलीस व तिच्या पालकांना बालकल्याण समिती समोर हजर करण्यास सांगितले.
मुलगी ही काचेच्या भांड्यासारखी असते त्या भांड्याला तडा जाऊ नये म्हणून मुलगीचे लग्न लाऊन दिले की, जबाबदारी संपली अश्यातून पालकांनी तिचे लग्न त्यांच्या पाहुण्यातच करून देण्याचे ठरवले होते. यावेळी मुलीला व तिच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, मुलांचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले.
मुलीला काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. यासाठी जागर बालविवाह रोखण्याचा प्रकल्प तसेच स्थानिक पातळीवरील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य मिळाले. तसेच बालकल्याण समिती सदस्या- अॅड.अश्विनी खाडे, पद्मजा गारे, अॅड.शिल्पा सुतार, अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी जागर प्रकल्प समन्वयक अनिकेत कदम, सतिश पाटील,किशोरी कांबळे यांनी परिश्रम घेतले.


