मलकापूर प्रतिनिधी:
मानवी जीवनामध्ये रसिकता असलीच पाहिजे तरच मानवी जीवनात आनंद व सौंदर्य बहारते. ज्ञान ,विज्ञान व संस्कृती यांना मानवी जीवनात विशेष असे महत्त्व आहे. सर्व धर्म हे माणसाच्या कल्याणासाठी आहेत हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. धर्माधर्मातील संवाद वाढला पाहिजे . धर्माची तपासणी सत्याच्या व विवेकाच्या कसोटीवरच झाली पाहिजे. सत्य- असत्य तसेच कल्याणकारी – संहारकशक्ती याची जाण होण्यासाठी विवेकवादी शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ख्यातनाम वक्ते व ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

ते मलकापूर पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात वाड्मय मंडळ व विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की कर्मकांड आला की विषमता येते. समाजामध्ये सत्याची पूजा व माणुसकीची पेरणी तसेच मूल्य पुरवठा करणारे ग्रंथ व विचार हे मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत. सध्याच्या काळात जग महात्मा गांधीचा विचार प्रमाण मानत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी. एन.घोलप हे होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की माणसाचा खऱ्या अर्थाने विकास विवेकवादी दृष्टी असल्यानेच होतो म्हणूनच विवेकाने राहणे ही काळाची गरज आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका ललिता सबनीस उपस्थित होत्या. कार्यक्रम स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नामदेव आडनाईक व वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ.बी. ए. सुतार यांची मुख्य उपस्थिती लाभली होती. यावेळी प्रा. प्रकाश नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार विवेक वाहिनीचे प्रमुख प्रा. डॉ. एन. के. कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा. डॉ.रमेश खबाले यांनी केले.


