
शाळेचा पहिला दिवस म्हणजे बाहेर रिमझिम बरसणारा पाऊस, नवा गणवेश, नवीन वह्या, नवीन पुस्तके, नवा वर्ग, नवे शिक्षक आणि नविन वर्गमित्र…. सोबतीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट, गुलाबफुले, चॉकलेट्स…
काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, काहींच्या डोळ्यात पाणी, तर काहींच्या आपल्या आई-बाबांना शोधणाऱ्या भेदरलेल्या नजरा… असा काहीसा किलबिलाटाने भरलेला नाविन्यपूर्ण पण अविस्मरणीय वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्राण्यांचे मुखवटे देण्यात आले होते. मुलांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर फुग्यांची सुंदर कमान बांधण्यात आली होती. विद्यार्थ्यांना औक्षण करून पेढे साखर वाटून व त्यांच्यावरती शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वर्गात प्रवेश देण्यात आला. मुलांचे शाळेतील पहिले पाऊल अविस्मरणीय ठरावे यासाठी पाच विद्यार्थ्यांच्या पावलाचा ठसा कागदावरती घेण्यात आला आहे व पालकांना भेट म्हणून त्याची फ्रेम देण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शाळेवर पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकांचे आभार मानले. *कार्यक्रमास माजी उपमहापौर श्री. सुनिल पाटीलसो, सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष जरगसो, श्री. प्रशांत जरगसो, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. संध्या देवडकर, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब काळे, ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील पाटील, श्री. युवराज सरनाईक सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप जाधव यांनी केले तर आभार श्री. अमित पोटकुले यांनी मानले.


