
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या इचलकरंजी-शिरोळ विधानसभा जिल्हाध्यक्षपदावर मोठा बदल करण्यात आला आहे.वैभव उगळे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी संजय चौगुले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आज गुरुवारी दैनिक सामना मध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेतील या बदलामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना माजी जिल्हाध्यक्ष वैभव उगळे म्हणाले, मला वरिष्ठांकडून शाहुवाडी-पन्हाळा विधानसभेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत विचारणा झाली होती.मात्र सध्या इचलकरंजी आणि शिरोळ येथील नगरपालिका निवडणुका सुरू असल्याने ते पद स्वीकारणे शक्य नसल्याचे मी स्पष्ट सांगितले होते.त्यावरूनच हा निर्णय घेतला असावा असे त्यांनी आज गुरुवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सांगितले.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांनी पदभार स्वीकारून कार्यकर्त्यांना एकजुटीने आगामी निवडणुकीस सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. बदलाच्या या निर्णयामुळे शिवसेना (उबाठा) गटात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत या बदलाचे राजकीय परिणाम काय दिसतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


