
कोल्हापूर : शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने अमृत योजनेअंतर्गत तब्बल ११५ कोटींच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र, या योजनेतील कामांचा दर्जा आणि प्रगती दोन्हीच प्रश्नचिन्हाखाली सापडले आहेत. ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अद्याप ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणावरून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी थेट महापालिकेवर सवाल उपस्थित करत, “महापालिका अमृत ठेकेदारावर एवढी मेहेरबान का?” असा थेट प्रश्न विचारला आहे. उत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देत ठेकेदारावरील कारवाईची मागणी केली आहे.कोल्हापूर शहराची पाणीपुरवठा यंत्रणा आजही जुनी आणि अपुरी आहे. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, ही समस्या सोडवण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून अंतर्गत जलवाहिन्यांचे बदल व उंच पाण्याच्या टाक्यांचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या योजनेतील कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत.
या योजनेत ८८ किलोमीटर जलवाहिन्या टाकणे, तसेच
सम्राटनगर (१३.५० लाख लिटर), ताराबाई पार्क (१६.१० लाख लिटर), बोंद्रेनगर (१३.५० लाख लिटर), पुईखडी (२० लाख लिटर), शिवाजी पार्क (८ लाख लिटर), बावडा रॉ वॉटर (७ लाख लिटर) आणि आपटेनगर (१८.३० लाख लिटर) या ठिकाणी उंच टाक्या उभारण्याची कामे अद्याप अपूर्ण आहेत.
१ सप्टेंबर २०१८ रोजी ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली होती. ३१ मार्च २०२४ पर्यंत चार वेळा मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे महापालिकेने ठेकेदाराला ठोठावलेला दंडही बीलातून वसूल केला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर थेट पाइपलाइनद्वारे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्याची आशा आहे, मात्र कामाच्या गतीकडे पाहता, ही आशा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.