
शिरोळ : महापूर, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाला असून, शासनाने शेतकऱ्यांची मागील शेतीपंपाची वीज बिले, पीक कर्जे माफ करावीत, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य पृथ्वीराजसिंह यादव यांनी केली.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन पाठवले आहे. जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतमजूर, कामगार, उद्योजक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले १४ दिवस शेतात पुराचे पाणी असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही.
शेतातील पिके कुजून जात आहेत. शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. भुईमूग, सोयाबीन, उडीद, पालेभाज्या, फळबागा यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. अशा कठीणप्रसंगी शेतकऱ्यांना ती मदत होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.


