
सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. या वर्षी देखील दुष्काळ येण्याची चिन्हे दिसत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ येथील आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे, अशी मागणी आज पलूस कडेगाव चे आमदार मा. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांनी विधानसभागृहात केली.
सांगली जिल्ह्यात दरवर्षीच कडक उन्हाळा असतो; कारण या ठिकाणी मागील वर्षी सर्वात कमी पाऊस पडला असल्याने यावर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. अशी परिस्थिती 2024 च्या उन्हाळ्यात येऊ नये, यासाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा विसर्ग आणि तेथील आवर्तन, निवर्तनाचे योग्य नियोजन लवकरात लवकर लावावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, “निश्चितपणे दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन सांगली व सातारा जिल्ह्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल. कालवा सल्लागार समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल व योग्य त्या सूचना देऊन, जिल्ह्याचे हित लक्षात घेऊन या संदर्भातील पावले उचलले जातील”, असे आश्वासन दिले आहे.


