
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते, राजकीय मंडळी व पक्ष यांच्याकडून जोरदार तयारी चालू असल्याचे दिसत आह. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय नेत्यांनी तयारी सुरू केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, कुरळप, बहादुरवाडी, कोरेगाव, ढवळी या गावांचा संपर्क दौरा केला. त्यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “महाविकास आघाडी व महायुतीतील पक्षांनी उमेदवारीसाठी मला गळ घातली आहे, पण दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जो तो आपल्या सोयीचे राजकारण करत आहे, कोण कुठे आहे, हे समजतच नाही त्यापेक्षा माझा शेतकरीच बरा”.
2024 ची लोकसभा निवडणूक मी शेतकऱ्यांच्या जीवावर लढणार आहे, कोणताच पक्ष मला नको असा माझा ठाम निर्णयअसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माझे शेतकरी बांधवच मला निवडून आणणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत माझ्यासमोर कोणताही विरोधक उभा असला तरी मला काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे.
सरकारने शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या बाजार मालावर अनेक निर्बंध आणि निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांचा रोष त्यांनी पत्करला, असे बोल त्यांनी भाजप सरकारला लावले. ‘यावर्षी कोणाच्या पंगतीत बसणार नाही आणि कोणत्याच पक्षाचा आधार घेणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही लढाई जिंकायची आहे, असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.


