
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शिवराज सिंह चौहान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे”, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या दौरांमध्ये अनेक नेते मंडळी, राजकीय पक्ष जोमाने तयारी करताना दिसत आहेत.
शरद पवार यांच्याकडे आता काहीही राहिलेले नाही. त्यांचे अस्तित्व काहीही उरले नाही. विरोधकांकडे नेता, नीती, नेतृत्व नाही. याउलट भाजपकडे मोदी यांचे भक्कम नेतृत्व आहे, अशी तुलनाही चौहान यांनी यावेळी केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली आणि विकसित भारत बनत आहे. प्रत्येक देश आता भारताचा जयजयकार करत आहे. अशा शब्दात चौहान यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.


