
कोल्हापूर : 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापासून कोल्हापुरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी नेमका उमेदवार कोण असणार? याबाबत अनेक चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. सोबतच तो उमेदवार कोण असेल याची उत्सुकताही प्रत्येकाला लागून राहिली आहे. याच सर्व चर्चांमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात श्रीमंत शाहू महाराजांच्या नावाची चर्चा समोर आणली.
कोल्हापूरकरांना चर्चेसाठी विषय मिळतो ना मिळतो, तोपर्यंत यावर छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिक्रिया देत या चर्चेची हवाच काढून घेतली आहे.
गेल्या महिन्याभरापासून छत्रपती शाहू महाराजांचे नाव राज्यसभा ते लोकसभा उमेदवारी पर्यंत समोर आल्याचे दिसून येत आहे, त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा कोल्हापूर दौरा पार पडला आणि या दौऱ्यानंतर ‘लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी छत्रपती शाहू महाराजच’ या चर्चेने उधाण घेतले. परंतु छत्रपती शाहू महाराजांनी या चर्चेला प्रतिक्रिया देत असताना अगदी स्पष्ट वक्तव्य केल्याने सुरू असलेल्या चर्चेची हवाच निघून गेले आहे.
छत्रपती शाहू महाराज म्हणाले, “लोकसभेचे उमेदवारी मला मिळाली तर अनेकांना आनंदच होईल; परंतु महाविकास आघाडीचा अद्याप फॉर्मुला ठरलेला नाही. हा फॉर्म्युला निश्चित होण्यात काही अडचण येणार नाही; परंतु मला अजून ऑफर्स आलेली नाही, आणि कदाचित मला ही ऑफर येईल अशी शक्यता आहे”, असं सांगत शाहू महाराजांनी लोकसभा उमेदवारीबद्दल भाष्य केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळेल का??? या प्रश्नाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


