
कोल्हापूर: विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडून आता लोकसभेच्या धरतीवर मतदार संघाची पाहणी आणि आपापल्या पक्षाला अहवाल देऊन सदरच्या मतदारसंघात जमेच्या असणाऱ्या बाजू आणि नाजूक बाजू याच्यावरती काम सुरू झाले आहे. या धर्तीवरती काँग्रेस पक्षाकडून देखील जिल्ह्यामध्ये नुकतीच पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली.

पण या मतदारसंघांमध्ये इच्छुकांच्या गर्दीमध्ये मध्ये नेमकं कोण-कोण आहेत हे आपण पाहुयात..
येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटाकडून तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजय देवणे इच्छुक आहेत.
गेल्या वर्षभरामध्ये राज्याच्या राजकारणामधील बदललेली समीकरणे विचारात घेता शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये फूट पडली आहे. परिणामी हसन मुश्रीफ यांच्या जाण्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडी थोडी कमकुवत झाली आहे. पण आगामी काळामध्ये यामध्ये काय बदल होतात हे पाहणं देखील आवश्यक ठरणार आहे.

तूर्तास काल झालेल्या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे देखील महाडिक परिवार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहेत. पण वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल अशा पद्धतीने आपण ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत हे दाखवून दिले आहे.
आमदार पी एन पाटील यांनी आयोजित केलेल्या सद्भावना यात्रेमध्ये जेव्हा लोकसभेची चर्चा रंगली तेव्हा बंटी पाटील आणि पी. एन. पाटील यांनी एकमेकांना लोकसभेवरती जाण्यासाठी आग्रह केला. तरी हा आग्रह गेले अनेक दिवस एकमेकांकडून विविध सभांच्या मध्ये प्रत्यक्षपणे वर्तवला जात आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही दिग्गज नेत्यांकडून काय निर्णय येणार याकडे मात्र कार्यकर्ता वर्गाचे लक्ष लागून आहे.

यादरम्यान आमदार पी एन पाटील यांचे खंदे समर्थक आणि गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे यांचे बंधू बाजीराव खाडे यांनी जिल्ह्यामध्ये बॅनरबाजी करत आपण ही लोकसभा निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार असल्याचे दाखवून दिले आहे.

गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांचे पुत्र आणि गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांनी देखील मतदार संघामध्ये जोर बैठका मारण्यास सुरुवात केली आहे.

कागल मधून संजय घाटगे यांचे देखील नाव आगामी लोकसभा निवडणुकीच्या इच्छुकांच्या गर्दीमध्ये आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधून महाविकास आघाडीला सुरुवात झाली आणि जिल्ह्यातील आघाडीत देखील बिघाडी आली. ही सगळी राजकीय स्थित्त्यांतरे पाहता येणारी निवडणूक ही चुरशीची होणार हे मात्र निश्चितच आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समोर आलेली नावे ही इच्छुक आहेत पण पक्षाकडून मात्र कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार की यादी बाहेरील नावेच यादीत सामील होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.


