
कागल येथे पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला ताल उत्सवच्या कलाकारांनी रंगमंचावर शिवसृष्टी अवतरली.शिवजयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवलेल्या पखवाज,ढोलकी, तबला, ढोल, संबळ,तुणतुणे,टाळ, मृदुंग ,बासरी, चिपळ्या, घुंगरू,हार्मोनियम, दिमडी, डफ, चौंडके अशा दोन डझनहून अधिक एकापेक्षा एक सरस पारंपरिक वाद्यांच्या तालावर उण्यापु-या पंचवीशीतील दीड डझन कलाकारांनी शिवभक्तांना अक्षरशः ठेका धरायला लावला. खचाखच भरलेल्या जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात या लोककलेला दाद देत मनमुराद आस्वाद लुटला.
शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातून पुढे आलेल्या कोल्हापूर येथील ” ऋषीकेश देशमाने प्रस्तुत ताल-उत्सव – जेथे वाद्ये बोलतात ” या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कलाविष्कार सादर केला. या कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात अभंग, वासुदेव,भारुड,पोवाडा,विविध शिवगीते, धनगरगीत, नंदीबैल, लावणी,शेतकरी गीते अशा विविध पारंपरिक गीतांचा धरलेला फेर लक्ष्यवेधी ठरला.काळाच्या ओघात पारंपरिक वाद्यांचा आवाज दुर्मिळ होत चालला असताना या स्थानिक कलाकारांनी “ताल उत्सव ” च्या माध्यमातून पारंपरिक वाद्ये व लोकसंगीत यांचा समन्वय साधत पारंपरिक वाद्येही बोलू शकतात ही संकल्पना रुजवली.
यावेळी श्रीमंत अखिलेशराजे घाटगे, यशराजे घाटगे, म्हाडाचे सीईओ अशोक पाटील,बाबासाहेब पाटील,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,सर्व संचालक,राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील, रमेश माळी याच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


