कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे

कागल: शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कागलमध्ये नागरिकांना वर्षांनुवर्षे नेत्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. बँकेच्या दारात लाभार्थ्यांना रांगेत उभारावे लागत आहे. नेत्याच्या राजकीय सभा समारंभांना उपस्थितीची सक्ती करून लाभार्थीना वेठीस धरले जात आहे. ही जुनी पद्धत मोडायची आहे. सहकार महर्षी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे लाभार्थ्यांना विनासायास शासनाच्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत यासाठी आग्रही होते. त्यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करत असून यापुढे लाभार्थ्यांनी नेत्याच्या दारात चकरा मारण्याची गरज नाही त्यासाठी “समरजीतसिंह आपल्या दारी “या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घरपोच देणार आहे ,असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. “राजे समरजितसिंह आपल्या दारी” चला पोहचवूया स्व. राजे साहेबांचे विधायक विचार घरोघरी” अभियानाच्या शुभारंभवेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन हजारहून अधिक उच्चांकी लाभार्थ्यांनी यावेळी नोंदणी केली. यानिमित्ताने विविध लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप केले. मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ओंकार धर्माधिकारी यांचाही सत्कार केला.
घाटगे पुढे म्हणाले, लोकांच्या दारात जाऊन लाभ देणे हा कागलसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत तालुक्यात कदाचित गुन्हा ठरवला जाईल. कारण कागलच्या राजकीय इतिहासात नेता लाभार्थ्याच्या दारी असा उपक्रम कधी घेतलाच गेला नाही. मात्र स्व. विक्रमसिंहराजेंच्या संस्कारानुसार आम्ही लाभार्थ्यांना पारदर्शीपणे एक रुपयाचाही भ्रष्टाचार न करता शासकीय योजनांचे लाभ देऊन त्यांना प्रत्यक्ष विधायक कार्यातून गुरुदक्षिणा देणार आहोत. माझे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा असून त्यांच्यामुळेच हे शक्य होते असेही ते म्हणाले. माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी म्हणाले, स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाश्वत विकास कामाच्या माध्यमातून सर्वसमान्यांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. त्यांना गुरुस्थानी ठेवून राजे समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत. त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसेवक म्हणून काम करण्याची संधी देऊया. यावेळी राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव,डोंगरी विकास समिती सदस्या विजया निंबाळकर,अरुण गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाबगोंडा पाटील, शाहूचे संचालक सचिन मगदूम, सतीश पाटील,राजे बँकेचे संचालक आप्पासो भोसले,आप्पासो हुच्चे, प्रकाश पाटील, धैर्यशील इंगळे, रणजीत पाटील, रमीज मुजावर,हिदायत नायकवडी, शीतल घाटगे, सुधा कदम आदी उपस्थित होते.स्वागत शाहूचे संचालक यशवंत ऊर्फ बाॕबी माने यांनी केले. आभार राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी मानले.


