
कोल्हापूर : (प्रतिनिधी अरविंद सावरतकर) कागल तालुक्यातील कुरुकली येथील ७७ नागरिकांच्या नावे भूखंड करण्याची प्रक्रिया गतीने राबवा. सोबतच कागदपत्र उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांबाबतही शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेता येईल यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कागल तालुक्यातील कुरुकली येथील भूखंडधारकांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कुरुकली येथील बेघर ७७ नागरिकांना घर बांधण्यासाठी शासनाकडून सन १९८९ मध्ये भूखंड देण्यात आले होते. कागदपत्रे उपलब्ध असणाऱ्या जागा मालकांच्या नावे संबंधित भूखंड करुन देण्याची कार्यवाही ताबडतोब करा. कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या नागरिकांबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना केली.
कुरुकली येथील पूरग्रस्त नागरिकांनी भूखंड मिळण्याबाबत आवाहन केले असता उर्वरित १६ पूरग्रस्तांनाही भूखंड वाटप करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केल्या आहेत.भूमिहीन बेघर नागरिकांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाकडे लवकरात लवकर सकारात्मक प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली.दरम्यान गडहिंग्लज शहरातील क्रीडा संकुलासाठी आरक्षित जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी2 मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आदी उपस्थित होते.


