
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जलतरण तलावांच्या दुरावस्थेबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने उपायुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन याविषयात निवेदन सादर केले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, राजर्षी शाहू जलतरण तलाव, टाकाळा हा एकात्मिक शहर विकास योजनेतून २१/०८/२००३ साली बांधण्यात आला. या तलावासाठी योजेनेतून २ कोटी २२ लाख इतका निधी देण्यात आला होता. राजर्षी शाहू जलतरण तलावामध्ये २०० ते ३०० विद्यार्थी रोज पोहायला शिकण्यासाठी येत होते. हा पूल ०८/०४/२०१५ ला खाजगी व्यवस्थापनाला वर्षाला ४ लाख ११ हजार २० वर्ष भाडे तत्वावर देण्यात आला. राजारामपुरी, शाहूपुरी, टाकाळा, प्रतिभानगर, टेंबलाईवाडी, रुईकर कॉलनी या संपूर्ण परिसरात हा एकच जलतरण तलाव आहे. त्यामुळे पोहायला शिकण्यासाठी, सरावासाठी खेळाडू मोठ्या प्रमाणावर याठिकाणी येत होते. परंतु दुर्देवाने १५ जून २०१९ पासून हा जलतरण तलाव बंद करण्यात आला आहे, त्याचबरोबर गेल्या चार वर्षामध्ये या तलावाचे चित्र रिकाम्या प्लॉट सारखे झाले असून तेथील सर्व साहित्य गंजलेले, प्लंबिंग, फिल्टर प्लांट कार्यबाह्य झाले आहे.

तसेच यावरील राजर्षी शाहू जलतरण तलाव हा नाम फलक सुद्धा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उदासीनतेमुळे शहरातील अनेक जलतरण तलाव दुर्लक्षित झाले असून हिरव्या पाण्यामध्ये सर्वांना पोहायला लागत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर या तलावांच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्रस्ताव अद्याप प्रलंबित का ? असा सवाल उपस्थित केला. जिल्हा उपाध्यक्ष गणेश देसाई यांनी अंबाई टंक अनेक वर्षे गळतीने बंद करण्यात आला होता यावर २० लाख रुपये दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले परंतु अद्यापही हि गळती सुरु असल्याचे सांगत हे पैसे कोठे खर्च करण्यात आले याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
भाजपा प्र.का.सदस्य राहूल चिकोडे यांनी प्रायव्हेट टंक चांगले सुरु आहेत पण महापालिकेला हे काम का करता येत नाही असे विचारत महापालिकेची कोणती गोष्ट सुरळीत चालत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जिल्हा चिटणीस विजयसिंह खाडे पाटील यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून अशा तलावांचे प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनी प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेत अधिकारी वर्ग विशिष्ट नेत्यांच्या दबावाला बळी पडून चांगल्या कामांना बजेट उपलब्ध करून देत नाहीत असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अजित ठाणेकर, दीपक जाधव, हेमंत आराध्ये यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपाच्या शिष्टमांडळाच्यावतीने या तलावांच्या दुरुस्तीबाबतचे सर्व प्रस्ताव तात्काळ आयुक्तांच्या समोर सादर करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर लवकरात लवकर राजर्षी शाहू जलतरण तलाव हा खेळाडू व सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यान्वित करा. अन्यथा भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना उपायुक्त रविकांत आडसूळ म्हणाले, जलतरण तलावांच्या विषयात पुढील आठवड्यात सविस्तर बैठक घेऊन येत्या ४ दिवसांत याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरचिटणीस संजय सावंत, गायत्री राऊत, उपाध्यक्ष राजू मोरे, शैलेश पाटील, उमा इंगळे, माधुरी नकाते, धनश्री तोडकर, किरण नकाते, सचिन तोडकर, संदीप देसाई, संतोष भिवटे, रोहित पोवार, जयराज निंबाळकर, तौफिक बागवान, मंगला निपाणीकर, संगीता खाडे, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, प्रकाश सरनाईक, गिरीष साळोखे, संतोष माळी, आजम जमादार, विजय गायकवाड, अशोक लोहार, दिलीप बोंद्रे, अवधूत भाटे, जयश्री वायचळ, सुमित पारखे, शाहरुख गडवाले ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


