
आपल्या देशातील सर्वाचीच इच्छा असलेले अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे . २२ जानेवारी रोजी आयोजित श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे . या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कागलच्या गैबी चौकात सोमवार दि . २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केले केले .
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, २२ जानेवारी २०२४ रोजी गैबी चौकात सकाळी ९.३० वाजता श्रीराम मुर्ती पुजन करुन कार्यक्रमास प्रारंभ होणार असून चक्रीभजन जुगलबंदी हा महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राटांचा कार्यक्रम होणार आहे .
सकाळी १०.०० वाजता गायक बाळासाहेब वाईकर ( अहमदनगर ), गायक – डॉ. निरज लांडे – (अकोला ), तबलावादक – पांडूरंग पवार ( पुणे ), पखवाज वादक ओंकार दळवी ( पुणे ) व सहकलाकार यांचा कार्यक्रम होणार आहे .
याचबरोबर २२ रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराचा लोकार्पण व मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे . याचबरोबर खुपीरे येथील प्रसिध्द २०० वारक-यांच्या मार्फत अखंड टाळमृदुंगाचा गजर व फुलांचा वर्षाव करून हा सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करणार आहोत . याचबरोबर कागल विधानसभा मतदार संघामध्ये अयोध्येतील मंदिराचा फोटो व श्रीरामांचा फोटो असलेली कापडी पिशवी १ लाख कुटुंबाना घरपोच दिली जाणार आहे . सायंकाळी ६ ते ९ – महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका मंजुषा पाटील – कुलकर्णी व सहकारी ( पुणे ) यांचा अभंगरंग भक्तीमय भजनाचा कार्यक्रम होणार आहे . या सर्व कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले .
भैया माने म्हणाले श्रीराम नवमी दिवशी मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस असतो . त्यामुळे श्रीराम व मंत्री मश्रीफ यांचे नाते वेगळे आहे . मंत्री मुश्रीफ यांनी राज्याचा कायदा बदलून कागल मध्ये श्रीराम मंदिर उभारले आहे . 22 तारखेला होणाऱ्या लोकोत्सव कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले . प्रवीण काळबर यांनी स्वागत केले . पत्रकार परिषदेस गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर,विकास पाटील, शशिकांत खोत, प्रविण भोसले, मनोज फराकटे, प्रवीण काळबर, संजय ठाणेकर, अँड. संग्राम गुरव,संजय चितारी , शामराव पाटील आदी उपस्थित होते.


