
राधानगरी / प्रतिनिधी: संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरल्याचा आरोप करत दोषींवर गुन्हे दाखल करून अटक करा. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत आकृतिबंधात समावेश करून किमान वेतन लागू करावे. यावलकर समितीचा अहवाल लागु करावा आदी मागण्या करत पंचायत समिती राधानगरी समोर काळ्या फिती लावून निदर्शने केली.
शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हिप्परगाथाडी येथील संगणक परिचालक अंबादास पेटेकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. शासनाची उदासीन धोरणे, सिएससी एसपीव्ही कंपनीकडून होणारा त्रास, तुटपुंजा पगार आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा मानसिक त्रास यामुळे संगणक परिचालकाचा बळी गेल्याचा आरोप करत राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आज काळ्याफिती लावून राधानगरी पंचायत समिती समोर निदर्शने केली.त्रासाला कंटाळून संगणक परिचालकाने ग्रामपंचायतीमध्ये आत्महत्या केल्याने संतप्त संगणक परिचालक संघटनेच्या वतीने घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार सुबोध वायगणकर, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी आर. बी. जंगम यांना मागण्यांची निवेदन देण्यात आली. यावेळी संगणक परिचालक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी शासनाने संगणक परिचालकांवर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी, यापुढे असा अन्याय झाल्यास संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष शहाजी पाटील, सचिव धनाजी पाटील, धनाजी आरडे, संदीप पाटील, अमर डोंगळे, सुमित जाधव, मच्छिंद्र सुतार, कल्पना कुंभार, स्मिता चौगले, वंदना पाटील, वैष्णवी कांबळे यांच्यासह राधानगरी तालुक्यातील संगणक परिचालकांनी सहभाग घेतला होता.


