
शिरोळ : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे देश सेवा बजावत असताना शिरोळ येथील सूरज भारत पाटील (वय २४) या जवानाला वीरमरण आले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सायंकाळी याबाबतची माहिती शिरोळमध्ये कळताच शोककळा पसरली. दोन वर्षांपूर्वी अग्निवीर म्हणून त्यांची देशसेवेसाठी निवड झाली होती. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचा पार्थिव शिरोळ येथे येण्याची शक्यता असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शिरोळ येथील निवृत्त सैनिक भारत पाटील यांचे चिरंजीव सूरज हे दोन वर्षांपूर्वी अग्निवीरच्या पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण होऊन मथुरा येथे देश सेवेसाठी हजर झाले होते. सूरज पाटील हे मथुरा येथे सुरक्षा सेवा बजावत असताना अचानक हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, नेमके मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
सूरज यांचा पार्थिव रविवारी रात्रीपर्यंत शिरोळ गावात त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. सूरज यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच आई-वडील, भाऊ, बहीण यांचा आक्रोश मन हेलावून सोडत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी, भाऊ, आजी असा परिवार आहे.


