मलकापूर प्रतिनिधी:
आपल्या बौद्धिकतेच्या बळावर ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवलेलं यश हे प्रेरणादायी आहे. जिद्द , चिकाटी आणि आत्मविश्वास अंगीकारून ध्येयाशी एकरूप होऊन केलेल्या अभ्यासाचे नक्कीच फळ मिळत असते. यासाठी अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी संचालक व माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी मलकापूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.

मलकापूर येथील रणवीरसिंह उदयसिंह कोकरे देसाई यांची राज्यसेवा आयोगामार्फत नगरअभियंता पदी निवड झाल्याबाबत आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक दिलीप सबनीस, उदयसिंह कोकरे देसाई, माजी नगरसेवक भगवान सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सर्जेराव पाटील म्हणाले की सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी आपली गुणवत्ता हीच आपल्याला यशोशिखरावर पोहचवत असते. ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत व जिद्दीने अभ्यास करून यशस्वी देखील होत आहेत .असणाऱ्या शैक्षणिक साधनांचा वापर करून आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मिळवलेले यश हे नक्कीच इतरांना देखील प्रेरणादायी असते.

यावेळी दत्त ग्रामीण पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजाराम विरळे, श्री सपाटे, श्री वारंगे, प्रसाद सिंदगी, ओंकार सबनीस,अमोल नरवणे, ओकांर फल्ले, ऋषीकेश सबनीस, रोहन मिरजकर ,श्री मोहिते आदि उपस्थित होते.



