दि १३ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, माघार घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे परंतु शुक्रवारपासून केवळ दुपारी तीननंतरच प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी तीन ते सहा दरम्यान नागरिकांना प्रशासकीय कामासाठी प्रवेश दिला जाईल. केवळ दहा दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन्हींसाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातच दाखल करावे लागतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर आवारात उमेदवार आणि त्यांच्या चार कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश असणार नाही. उमेदवारांसोबत तीन वाहनांनाच परवानगी देण्यात येईल.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेचा भाग आहेत. त्यामुळे ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारणे यांसह इतर प्रक्रियेत असतील. परिणामी, नागरिकांच्या कामासाठी त्यांना वेळ मिळेलच असे होणार नाही. नागरिकांना त्यांच्या वेळेचे नियोजन करता यावे म्हणून दुपारी तीन ते सहा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय सर्वांसाठी खुले असेल. अत्यावश्यक आणि मुदतीतील काम असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत प्रवेश असेल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.


