
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केली आहे.
जेव्हा सत्ता होती त्यावेळेस फक्त ऑनलाईनच काम केलेले आहे. तळागळात जाऊन रस्त्यावर उतरून काम केले असते तर सत्ता असतानाच प्रश्न संपले असते, असा टोला राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे रस्त्यावर फिरतात म्हणून त्यांना समस्या दिसतात आणि त्या सोडवण्यासाठी ते मार्ग काढतात. ‘करायचं काय नाही आणि दुसऱ्यांची मापं काढायचे असले धंदे सुरू आहेत, अशा शब्दात राजेश शिरसागर यांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
यावेळी बोलत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला आहे, ‘आदित्य ठाकरेंचा तोल सुटला आहे. त्यांच वय नसेल इतके वर्ष मी शिवसेनेत काम केलं, आपलं काय चुकतं याच आत्मपरीक्षण आदित्य ठाकरे यांनी करावे’ अशा शब्दात क्षीरसागर यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णय घेतले कोणत्याही समाजाला धक्का न लागता मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले; परंतु काही नेत्यांनी यामध्ये विरजण टाकले. इतक्या वर्षात गड पाहिला नव्हता, पण आता गडावर जात आहेत.
मात्र जनतेला सगळी परिस्थिती समजते, अशा शब्दात शिरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.


