
कोल्हापूर : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत आहे. याच लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उसाच्या एफआरपीचा दर वाढवला परंतु; ही वाढ तोकडी असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि सध्या वाढलेले खतांचे दर या सगळ्याचा विचार करता केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी मध्ये केलेली वाढ ही अपुरी आहे, एफआरपीमध्ये अजून वाढ होणे गरजेचे आहे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी प्रतिटन 225 रुपयांची वाढ केली आहे; परंतु शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि खतांच्या किमती लक्षात घेता एफ आर पी मध्ये तातडीने आणखी वाढ करावी अशी इच्छा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
ऑगस्ट महिन्यात कृषी मूल्य आयोग उसाचे एफ आर पी जाहीर करते परंतु यावर्षी येत्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यातच दर जाहीर केले आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. साखरेच्या निर्यातीवर बंदी असल्याने देशातील साखरेचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील, अशी इच्छा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.


