
कृषि क्षेत्रात आलेल्या यांत्रिकीकरणामुळे, ग्रामीण भागातील पशूधनाची संख्या कमी होवू लागलीय. अजुनही काही शेतकरी मोठ्या कष्टानं आणि मायेने गाय, बैल अशा जनावरांचा सांभाळ करतात. सध्याच्या डिजिटल युगात पारंपारिक खेळ टिकून रहावेत आणि बळीराजाचा उत्साह वाढावा, यासाठी ग्रामीण भागात चिखल गुठ्ठा शर्यतीचे आयोजन केल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून जिल्हयात खासदार क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले आहे, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नितवडे इथं झालेल्या चिखल गुठ्ठा स्पर्धेत उत्साही आणि जल्लोषी वातावरण पहायला मिळाले.

भुदरगड तालुक्यातील नितवडे इथं धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने, चिखल गुठ्ठा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, नियोजन समितीचे सदस्य बाबा नांदेकर, सरपंच प्रकाश वास्कर उपस्थित होते. युवा पिढीमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हयात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलंय. त्यातून अनेक खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळाल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी नमुद केले. तसेच ग्रामीण भागातील लोकसंस्कृती लक्षात घेवून, बळीराजाचा उत्साह वाढवण्यासाठी चिखल गुठ्ठा स्पर्धा भरवल्याचे त्यांनी सांगितले.
काळाच्या ओघात पशूधन कमी होत चाललंय. मात्र अशा वेळी आपल्या जनावरांचा प्रेमाने सांभाळ करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. दिवसभर शेतात काबाड कष्ट करणार्या शेतकर्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे आनंदाचा उत्सव असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सांगितले. दरम्यान गुठ्ठा बांधलेली बैलजोडी घेवून, कृष्णराज महाडिक थेट चिखलात उतरले. अत्यंत चपळाईने आणि कौशल्यानं बैल जोडी पळवून, त्यांनी स्पर्धेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
या चिखल गुठ्ठा स्पर्धेत बोलकेवाडी इथल्या बाबू बोलके यांच्या बैलजोडीने आणि शाहुवाडी तालुक्यातील कै. धोडींबा पाटील यांच्या रेडा जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर राधानगरीतील शंकर प्रेमी ग्रुपच्या बैलजोडीने आणि देऊळवाडीतील केदारलिंग ग्रुपच्या रेडा जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. तालुका कृषीप्रमुख किरण पाटील, दत्तात्रय भेंडवडेकर, सर्जेराव गुरव, युवराज देसाई यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी नाथाजी पाटील, नंदकुमार शिंदे, शशिकांत पाटील, तुकाराम देसाई, पांडुरंग गुरव, विनोद जाधव, सत्यजित वेतुर्लेकर, बाजीराव देसाई, दिगंबर गुरव, पंडितराव पाटील, उत्तम पाटील, रणजित आडके यांच्यासह भुदरगड तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.


