
कोल्हापूर : इमारत व इतर बांधकाम कामगारांना दैनंदिन माध्यान भोजन पुरविणेत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीत कामगार वर्ग व ठेकेदार यांची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजातील सर्वच घटकांप्रती समाजाभिमुख कार्य सुरु आहे. नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना दैनंदिन माध्यान भोजन पुरविणेत येणाऱ्या राज्यातील संबंधित कामगारांच्या विषयावर जोरदार वादळी चर्चा झालेली आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील श्रमजीवी कष्टकरी व असंघटीत क्षेत्रातील संबंधित कामगारांना मोठा दिलासा मिळाल्याने, राज्य शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय आहे. तरीदेखील अलीकडील काळात काही गंभीर बाबी समोर येत आहेत. जनतेच्या निधीचा चुकीच्या पध्दतीने अपव्यय होऊ नये, या कारणास्तव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संबंधित कामगारांना पुरविणेत येणाऱ्या दैनंदिन माध्यान्न भोजनाची जनहितार्थ सविस्तर माहिती मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सदर योजनेबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या असतील तर, त्याबाबत सहा. कामगार आयुक्तांनी केलेल्या सकारात्मक कार्यवाहीची माहिती सुध्दा देणेत यावी, अशा आशयाचे निवेदन त्यांच्या कार्यालयात देणेत आले असल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी शिष्ट मंडळामध्ये महादेव चक्के, संजय सासणे, अनिता काळे, भगवान माने, शिवाजी चौगुले, संभाजी थोरात, मंगेश माने, नारायण धनगर, बाजीराव हेवाळे, श्रीकांत माजगावकर, बाजीराव हुलस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.


